मुंबई: भाजपने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आणि त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. त्यामुळेच की काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याच्या विचारात आहे.
मुंबई आणि ठाण्यात काल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ही मागणी पुढे आली होती. या बैठकीत राज ठाकरे मात्र उपस्थित नव्हते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याचा प्रस्ताव मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. 'अतिशय चांगलं वकृत्त्व असणारा तरुण नेता आमच्याकडे आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात काहीही चुकीचं नाही,' असं मनसे आमदार प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंना मनसेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल. या रणनीतीमुळे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं मळभ झटकून विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यास सज्ज होतील, असं पक्षाचं मत आहे.
पंतप्रधानपदासाठी जसा जनतेना मोदींना कौल दिला, तसंच राज यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं तर विधानसभा निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळेल, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे येत्या ३१ मे रोजी मुंबईत सभा घेणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा