६/३०/२०१४

रिझर्व्हेशन सुरू होताच हाऊसफुल्ल, दलालांचा फटका

रिझर्व्हेशन सुरू होताच हाऊसफुल्ल, दलालांचा फटका


कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या गणेशभक्तांसमोर दलालांचं विघ्न दूर करण्याचं आव्हान आहे. काल या गाड्यांसाठी आरक्षण सुरु झालं आणि अवघ्या काही मिनिटातचं हाऊसफुल्ल झालं. त्यामुळं रात्रभर तिकीटांसाठी रांगेत उभ्या असणाऱ्या प्रवाशांची निराशा झाली. या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केलीय.
गणेशोत्सावासाठी रेल्वेनं कोकणात जाण्यासाठी तिकीट काऊंटरवर गर्दी केलेल्या गणेशभक्तांना दलालांच्या विघ्नाचा सामना करावा लागतोय. 29 ऑगस्टच्या गणेश चतुर्थीचं बुकींग रविवारपासून सुरु झालं. कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी रात्रीपासूनच प्रत्येक रेल्वे स्थानकातील बुकिंग विंडो समोर लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. मोहन केळुस्कर हे यापैकीच एक. कुडाळला जाण्यासाठी त्यांनी चर्चगेटच्या रेल्वे बुकिंग काऊंटरवर तिकीट काढण्यासाठी २६ जूनच्या रात्री पासूनच रांग लावली होती. रांगेत तिसरा नंबर असूनही त्यांना तीनशे वेटिंग असल्याचं सांगण्यात आलं. हीच परिस्थिती दादर, ठाणे, बोरीवली, सीएसटी, कल्याण या रेल्वे बुकिंग काऊंटरवर होती.
काही मिनिटातचं कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या फुल्ल झाल्या. त्यामुळं लाखो प्रवासी आणि गणेशभक्तांची निराशा झाली. रेल्वेमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते विनोद तावडे यांनी केलीय.
रेल्वे तिकीट दलालांच्या रॅकेटमुळं सामान्य प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वे मंत्रालयानं दलालांचं विघ्न दूर करुन कोकणताल्या गणेशभक्तांसाठी संकटमोचकाची भूमिका बजवण्याची गरज आता आलीय.

Zee 24 Tas

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search