महाराष्ट्र


क्षेत्रफळ ३०७,७१३ km² (११८,८०९ sq mi)
राजधानी मुंबई
मोठे शहर मुंबई
जिल्हे ३५
 ३१४.४२/km² (८१४/sq mi)
भाषा मराठी

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे. 

इतिहास:

पहिले शेतकरी

मध्यपाषाण कालीन ४००० इस पुर्व धान्याची लागवड तापी नदीच्या खोर्‍यात सुरु झाले. जोर्वे येथे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमः सापडले जे १५०० इ.पु. चे आहेत. या संस्कृतीचे नामकरण गावाच्या नावाहुन करण्यात आले आहे. त्यात मुख्यतः रंगवलेले भांडी व तांब्यापासुन बनवलेले भांडी आणि शस्त्रे सापडली. येथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली आहे. ते विविध पिके पिकवत होते. येथील घरे मोठे चौकोनी, चट्टे व माती पासुन बनवलेली असत. धान्य कोठारांत व कनगीत साठवलेली आढळते. स्वयंपाक दोन कोन्याच्या चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.

अश्ववाहक/राऊत समाज
पहिले नागरीकीकरण
मौर्य ते यादव
(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)

मौर्य साम्राज्याचा काळ:
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) अंतर्गत होता. या काळात महाराष्ट्राने भरभरटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

सातवाहन साम्राज्याचा काळ:
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराण होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतेचा मानला जातो. अर्थात्‌ या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा महत्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

वाकाटकांचा काळ:
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळांत महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत राजाश्रयामुळे उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळांतील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

कलाचूरींचा काळ:
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराणे इ.स. च्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

बदामी चालूक्य आणि कल्याणी चालूक्यांचा काळ:
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमान होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.

राष्ट्रकुटाचा काळ:
दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधले.

यादवांचा काळ:
महाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टात आणली.

यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्ती सांप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

अजिंठ्यातील लेणी:
महाराष्ट्रातील विविध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.
मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य

महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.

त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.
मराठा व पेशवे
१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.

शिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.

इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.
ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.

महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
हुतात्मा स्मारक,मुंबई


ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.

अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.

भौगोलिक स्थान

महाराष्ट्रातील पर्वत:
महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.


प्रशासन
मंत्रालय
महाराष्ट्र राज्य:

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.

महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉँग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. 

महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यात विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.


महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे

कळसूबाई - १,६४६ मी.
साल्हेर - १,५६७ मी.
महाबळेश्र्वर -१,४३८ मी.
हरिश्चंद्रगड -१,४२४ मी


महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे

त्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक
घृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद
भीमाशंकर- जिल्हा पुणे
परळी वैजनाथ- जिल्हा बीड
औंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.


महाराष्ट्रातील महानगरपालिका

-नवी मुंबई - मुंबई- उल्हासनगर- कल्याण डोंबिवली - ठाणे
-पुणे - पिंपरी चिंचवड - नाशिक - भिवंडी - औरंगाबाद - कोल्हापूर
-सांगली - सोलापूर - नांदेड - मालेगाव - अकोला - अमरावती - नागपूर
-मीरा-भायंदर - जळगाव - धुळे - अहमदनगर - वासी- लातूर- उस्मानाबाद.










संदर्भ: Google.com, mr.Wikipedia.com, Maharashtratourism.gov.in,www.m4marathi.net/forum

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search